माणुसकीचा महामेरू! थोरल्या भावाच्या निधनानंतर दीराने धरला वहिनीचा हात; अपंग पुतण्यासह दोन्ही मुलांचे स्वीकारले पितृत्व** मराठा समाजातून निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत; आमखेल कुटुंबाचा समाजासमोर आदर्श

माणुसकीचा महामेरू! थोरल्या भावाच्या निधनानंतर दीराने धरला वहिनीचा हात; अपंग पुतण्यासह दोन्ही मुलांचे स्वीकारले पितृत्व** मराठा समाजातून निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत; आमखेल कुटुंबाचा समाजासमोर आदर्श

पिंपळनेर | दि. 26 (साक्री तालुका प्रतिनिधी : अंबादास बेनुस्कर)

आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी युगात माणुसकी अजूनही जिवंत आहे, याचे प्रेरणादायी उदाहरण साक्री तालुक्यातील आमखेल येथील एका कुटुंबाने समाजासमोर ठेवले आहे. थोरल्या भावाच्या निधनानंतर उघड्यावर पडलेल्या संसाराला आधार देण्यासाठी धाकट्या भावाने वहिनीशी विवाह करून कर्तव्य, प्रेम आणि जबाबदारीचा अनोखा आदर्श घालून दिला आहे.

कर्तव्याची जाणीव आणि धाडसी निर्णय

आमखेल येथील रवींद्र (सोनू) यांचे थोरले बंधू दीर्घ आजाराने निधन पावल्याने त्यांचे कुटुंब संकटात सापडले होते. पत्नी कविता वहिनी आणि दोन लहान मुलांचे भविष्य अंधारात गेले होते. त्यातच एक मुलगा अपंग असल्याने त्याच्या संगोपनाची जबाबदारी अधिकच कठीण होती.

अशा कठीण प्रसंगी समाज काय म्हणेल याचा विचार न करता, केवळ कर्तव्यभावनेतून रवींद्र (सोनू) यांनी वहिनीशी विवाह करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. बुधवार दि. 24 रोजी साक्री तालुक्यातील धनाई पुनाई माता मंदिरात हा मंगलमयी विवाह सोहळा अत्यंत साध्या व पवित्र वातावरणात पार पडला.

दोन्ही मुलांचे स्वीकारले पितृत्व

या विवाहातून सोनू यांनी केवळ नातेसंबंध जपले नाहीत, तर अपंग पुतण्यासह दोन्ही मुलांचे पितृत्व स्वीकारून माणुसकीचा सर्वोच्च आदर्श समाजासमोर ठेवला आहे. निराधार झालेल्या कुटुंबाला त्यांनी छत्र दिले.

कुटुंबाची भक्कम साथ; सुनेऐवजी ‘मुलगी’

हा निर्णय फक्त रवींद्र यांचाच नव्हता, तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने या निर्णयाला खंबीर साथ दिली. सासू-सासऱ्यांनी सुनेला ‘सून’ नव्हे तर ‘मुलगी’ मानून सन्मानाने घरात स्थान दिले. तसेच सोनू यांच्या दोन्ही विवाहित बहिणींनीही भावाच्या या निर्णयाला पाठिंबा देत भगिनीप्रेमाचा आदर्श निर्माण केला.

समाजाला नवी दिशा

ग्रामीण भागातून पुढे आलेला हा विचार जुन्या रूढी-परंपरांना छेद देणारा आहे. विशेषतः मराठा समाजातून या निर्णयाचे मोठ्या अभिमानाने स्वागत होत असून, हा विवाह समाजाला नवी दिशा देणारा ठरत आहे. माणुसकीचा धर्म सर्व धर्मांहून श्रेष्ठ असल्याचे या कुटुंबाने कृतीतून सिद्ध केले आहे.

सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव

रवींद्र (सोनू), कविता वहिनी तसेच या निर्णयाला पाठबळ देणारे आई-वडील व बहिणींवर संपूर्ण धुळे जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आमखेल गावाची मान उंचावणारा हा विवाह खऱ्या अर्थाने समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

🔔 अशाच प्रेरणादायी, सामाजिक आणि स्थानिक बातम्यांसाठी ‘सिल्लोड एक्सप्रेस (SX न्यूज)’ चॅनलला Subscribe करा, Like करा आणि Share करा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

2

3